Friday 12 December 2014


.... त्या दिवशी आचारा गाव होतं निकामी


बा देवा रामेश्वरा.... तुझ्या हुकूमानुसार आज आचरा गाव आम्ही रिकामं करतोय, सगळ्यांची रखवाली कर आणि वर्षानुवर्षे चालणारी ही प्रथा खरी करुन घे... आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात दर तीन वर्षांनी असंच गा-हाणं घातलं जातं आणि भक्तांचा होय महाराजा चा स्वर घंटानादासह दणाणू लागतो... गाऱ्हाण्यानंतर श्री रामेश्वर मंदिराची तिन्ही प्रवेशद्वारं बारा पाचाच्या मानकऱ्यांच्या हातानं बंद केली जातात... नगारखान्यातील नगारा दणाणतो... आणि तीन दिवसाच्या गावपळणीसाठी संपूर्ण आचरा गाव वेशीबाहेर जाण्यासाठी सज्ज होतो... 

कोकणात सण-उत्सव आणि प्रथा-परंपरांना मोठं महत्त्व आहे. गैरवशाली परंपरा लाभलेल्या मालवण तालुक्यातील आचरे या गावात शेकडो वर्षाची एक अनोखी प्रथा आजही जोपासली जातेय. दर तीन वर्षानंतर गावपणळणीची कुजबूज कोकणात होते. मार्गशीष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला रामेश्वराला कौल लावला जातो. देवाचा कौल मिळाल्यानंतर गाव पळणीची तारीख निश्चित होते आणि त्या दिवशी संपूर्ण गावातील समस्त शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक, मजूर बायका, मुले, गुरं-ढोरांसह गावाच्या वेशी बाहेर पडतात. यावेळी शाळाही भरत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामस्थांचा लवलेशही नसतो.

गावपळणची प्रथा मालवण तालुक्यातील वायगंणी, चिंदर, मुणगे या गावांमध्येही दिसून येते. आचऱ्यातील पारवाडी, कारवणे, देऊळवाडी बाजारपेठ, त्रिंबक पिरावाडी, जामडूल नदी, गाऊळवाडी, भंडारवाडा, हिर्लेवाडी-वायंगणी या गावातील वेशीबाहेर पडणारे काही ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्य करतात तर काहीजण मालवण भगवंत गडाच्या रस्त्यालगत राहुट्या थाटतात. तात्पुरत्या स्वरुपाच्या बांधलेल्या राहुट्या बघितल्यानंतर जणू काही वेगळं गावंच थाटल्यासारखं वाटतं. नोकरी उद्योगाच्या निमित्तानं परगावी जाणारे किंवा मुंबईला असणारी मंडळी तीन वर्षांनी येणाऱ्या या वेगळेपणाची जपणूक करण्यासाठी एकत्र येतात.  

शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थ मोठ्य़ा श्रद्धेनं जोपासत आहेत. तीन दिवस आणि तीन रात्री नंतर बारा पाचाचे मानकरी गाव भरवतात आणि रामेश्वराला कौल लावतात त्या दिवशी  कौल झालाच नाही तर एक दिवस वाढवला जातो त्यानंतर पुन्हा चैथ्या दिवशी कौल दाखवला जातो रामेश्वरानं कौल दिला तर पुन्हा तोफांचा आवाज दणाणतो आणि आचरेवासीय पुन्हा आपल्या गावी परतात.

शेकडो वर्षांपासून चालत आलेली गावपळणीची प्रथा का आणि कशासाठी? याविषय़ी अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र ही गावपळण आपलं वेगळेपण दाखवते हे  मात्र निश्चित.



Friday 28 November 2014


कौतुकाचा वर्षाव की सहानुभूती ?? 

कोकणात जायचं म्हणटलं तर साऱ्या प्रवाशांची पावलं आपसुकच वळतात ती कोकण रेल्वेकडे... कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित नसल्याचा निर्वाळा सुरक्षा आयुक्तांनी यापूर्वीच दिला होता पण असं असलं तरी खिशाला परवडणारं तिकीट आणि जलद गतीचा प्रवास यामुळेच कोकण रेल्वे सदानकदा ओव्हरलोडेड दिसते. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे ट्रॅकमॅन नेहमीच दक्ष असतात... सचिन पाडावे त्यापैकीच एक... आज सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनाने कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले... अशा या कोकणच्या सुपूत्राचं अनेकांनी कौतुकही केलं. बॅकस्टेजला काम करणाऱ्या कोकणपुत्राच्या शौर्याची बातमी सर्वच न्यूज पेपरमध्ये फ्रंट पेजला छापण्यात आली होती... पण या सचिनच्या पदरात कोकण रेल्वे प्रशासनाने मात्र फक्त ३०० रुपयांची मानधन भीक घातली. एवढचं नाही तर त्याला खडे बोलही सुनावले....

सचिन पाडावे... रेल्वेमार्गावर गस्त घालण्याचं काम करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ इथल्या एका पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरित रेल्वे कंट्रोल रुम आणि उक्षी स्टेशनला याबाबतची माहिती दिली. मात्र तोपर्यंत उक्षी स्टेशनवरून कोकणकन्या एक्स्प्रेस सुटल्याची माहिती त्यांना मिळाली.  ताशी ७५ किमी वेगानं येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातल्या टॉर्चच्या साहाय्यानं सचिन तुटलेल्या ट्रॅकपासून उक्षी स्टेशनच्या दिशेनं धावत सुटले आणि हातातल्या बॅनरनं उक्षी बोगद्याजवळ असलेल्या कोकणकन्या एक्सप्रसेच्या इंजिन चालकाला त्यांनी धोक्याची खूण केली. इंजिन चालकानंही प्रसंगावधान दाखवून त्वरित ब्रेक दाबला आणि कोकणकन्या एक्सप्रेस तुटलेल्या ट्रॅकच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर थांबवली आणि कोकणकन्येचा अपघात टळला. 
ताशी ७५ किमी वेगाने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस त्या तुटलेल्या ट्रॅकवरुन गेली असती तर ती थेट नदीत कोसळली असती आणि हजारो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असतेमात्र ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनामुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. आपली चोख जबाबदारी पार पाडणाऱ्या सचिनच्या शौर्यामुळेच कोकणकन्या एक्सप्रेसचा अपघात टळला...
कौतुकाचा वर्षाव सचिनवर तर होत होताच पण कोकण रेल्वे प्रशासनाचं तोंड काहीसं कडवं झालं होतं... रेल्वे प्रशासनाची परमिशन न घेता वार्ताहरांना आपली कामगिरी सांगितल्यामुळे सचिन यांना कोकण रेल्वे प्रशासनानं दटावणी केली... परंतु जीवाची बाजी लावून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवताना त्यांनी बजावलेली ड्यूटी या प्रशासनाला कदाचित समजलीच नसावी आणि म्हणूनच एवढा अपघात टाळणाऱ्या कोकणपुत्राला फक्त ३०० रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं असावं...

रेल्वे प्रशासनानं पाडावे यांना दिलेली वागणूक पाहता रेल्वे प्रशासनाची खरचं कीव वाटू लागली आणि भर उन्हांत ट्रॅकची तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्यूटी डोळ्यासमोर तरळू लागली...

Friday 21 November 2014


इंजिनिअरते बाबा

१९५१मध्ये हरयाणातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला रामपाल आज स्वयंघोषित अध्यात्मिक संत (बाबा) झालाय ... कधी काळी सरकारी इंजिनिअर असणाऱ्या रामपालला वागणूक योग्य नसल्यानं नोकरी गमवावी लागली... हे झाल्यावर तरी एखादा शहाणा झाला असता, पण नाही.... याला संत कबीर यांचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला... मग काय इंजिनियर रामपालनं थेट बाबा रामपाल असा अवतारच धारण केला... आजकाल कुणालाही असाच साक्षात्कार होतो, मग तो स्वत:ला संत म्हणवून घेतो आणि सुरू होतो सत्संग... किंवा श्रद्धेचा बाजार... बाबा रामपालनं याच बाजारातून चांगला १०० कोटींचा भरभक्कम मलिदा जमवला.

हरयाणातल्या बरबालामध्ये १२ एकर परिसरात रामपाल बाबानं आश्रम थाटला. या आश्रमात भक्तांची तर कमतरताच नव्हती. भक्तांसाठी खास एसी रुम, लेक्चर देण्यासाठी हॉलमध्ये मोठ-मोठे एलइडी स्क्रीन्स... रामपाल बाबा BMW, मर्सिडीजशिवाय कुठे हिंडतही नव्हता... मार्केटिंग कसं करावं याचं अचूक गणित रामपालनं जाणलं आणि अभियांत्रिकी डोक्याची त्याला जोड दिली. म्हणूनच त्याची स्वत:ची वेबसाइटही आहे.  याच वेबसाइटवरून बाबा रामपाल ग्यान देत होता. एवढंच नाही, या वेबसाइटवर रामपालचा संत्संगही लाइव्ह दाखवला जात होता. आजच्या जमान्याला सूट होण्यासाठी या भोंदूबाबाचं फेसबुक, यू-ट्यूबलाही अकाउंट होतंच. साहजिकच बाबाचे फॅन्सफॉलोअर्सही भरपूर...

कोणत्याही देवाला मानत नाही, पण बाबा रामपाल स्वत:ला मात्र परमेश्वराचा अवतार समजतो. ध्यान करणाऱ्या बाबाला त्याचे भक्त दुधानं अंघोळ घालायचे आणि त्याच दुधापासून बनवलेली खीर प्रसाद म्हणून खायचेही... आर्य समाजाशी संघर्ष करणाऱ्या या बाबावर खुनाचा गुन्हाही आहे. २००६ मध्ये रामपालच्या समर्थकांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला त्यात एक महिला ठार झाली. त्यावेळी तो तुरुंगातही गेला होता. २०१३ मध्ये स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षात तिघांना जीव गमवावा लागला. कोर्टाच्या आदेशानंतरही हा बाबा सलग तब्बल ४२ वेळा सुनावणीला गैरहजरच राहिला. अशा या निर्लज्ज बाबा रामपालला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना जिवाचं रान करावं लागलं. पण बिचारे पोलीस तरी काय करणार? ४ हजारांवर सशस्त्र फौजच या बाबाकडे होती. स्वत:च्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या राष्ट्रीय समाज सेवा समितीतला (RSSS)  जवान आपल्या बाबाचं संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक बंदुकीसह सज्ज असायचा.

बाबा रामपालचे हे कारनामे, कारस्थानं पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकातच जावी. पण मुद्दा असा आहे की, खून प्रकरणात कोर्टानं वॉरंट बजावल्यावरही हजर न होणाऱ्या बाबासाठी जीव ओवाळणारे भक्त कसे निर्माण होतायत? हाती बंदूक घेऊन बाबाला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट फायरिंग करण्याचं धैर्य त्याचे कमांडो कसं दाखवतायत? हे रक्षक रक्षणाचं कामच करत होते, असं कुणी म्हणेल. पण, बाबाला पोलिसांनी नेऊ नये, यासाठी रस्ता अडवणारे भक्तही दिसत होतेच. ही अंधश्रद्धा कुठून येते? याचं समर्थन कोण कसं करू शकेल? रामपाल पोलिसांना शरण जाईपर्यंत चार महिला आणि एक दीड वर्षांचं चिमुकलं बाळ मृत्युमुखी पडलं. हे ऐकल्यावर तर लाजेनं मानच खाली गेली...

बुवाबाजी करून इतरांना टोप्या घालणारे बरेच बाबा आपण पाहिलेत. पण सशस्त्र कमांडोच बाळगून पोलिसांना विरोध करणारा, थेट कायद्यालाच आव्हान देणारा बाबा रामपाल बहुधा पहिलाच असावा. अखेर हा बाबा रामपाल गजाआड गेलाय. पण त्याच्या अटकेमुळे हे प्रकरण संपलं, असं म्हणायचं का? सतपाल आश्रमातून इंजिनिअर बाबाला अटक झाली असली, तरी या अटकेतून अनेक प्रश्न  नव्यानं उपस्थित झालेयत.

संत कबीर यांचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्या रामपालबाबाची वृत्ती पाहिल्यानंतर खरोखरचं त्यानं कबीर वाचलं असेल का? अशी शंका निर्माण होतेय... आजपर्यंत अनेक भोंदूबाबांची कटकारस्थानं उघडकीस आली तरीही लोकांना शहाणपण का सूचत नाही? एखाद्या भाविकाची भक्ती इतकी आंधळी कशी काय असू शकते....?

         



Wednesday 19 November 2014


३० वर्षांचा रंगावली परिवाराचा अखंडित प्रवास



एखाच्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सर्रकन एखादी रेषा उमटावी, त्यात रंगकाम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र निर्माण व्हावं, असा अनुभव आपण अनेकदा घेतो. पण त्याच चित्रकाराच्या जागी जर रांगोळीकार असेल तर! ही गोष्ट अशक्य वाटते ना? हीच अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न केलाय जोगेश्वरीतल्या रंगावली परिवाराने.

दिवाळी  म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, गोडा-तिखटाचा फराळ आणि दरवाज्यात सुंदर रांगोळी. रांगोळी हा विषयच असा आहे की तो शब्द जरी कानावर पडला तरी मराठी माणसांच्या चेह-यावर एक स्मितरेषा उमटतेच. आजकाल अनेक कलाप्रेमी खास रंगावलीचं प्रदर्शन भरवू लागले आहेत. रांगोळी प्रदर्शन भरवणं खरं तर खूप वेगळं आणि आनंददायी आहे. रांगोळी प्रदर्शन किती जणांनी पाहिलं याहीपेक्षा आम्ही ते भरवलं आणि आम्हांला नवीन काहीतरी शिकायला मिळालं या गोष्टीचं समाधान या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. कलाकारांच्या बोटात एवढी जादू असते की रसिक त्यात गुंगुनच गेलाच पाहिजे! असेच कलाकार जोगेश्वरीतल्या रंगावली परिवाराला लाभले आणि या परिवाराचा आज वटवृक्ष झाला.

जोगेश्वरीमधील बांद्रेकरवाडी तशी सर्वांच्याच परिचयाची....  दिवाळीमध्ये सर्वांची पावलं वळतात ती बांद्रेकरवाडीतल्या समर्थ विद्यालयात. याच विद्यालयामध्ये दरवर्षी रंगावली परिवार रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करतं. यंदा या परिवाराचं हे तिसावं वर्ष आहे. दरवर्षी काहीना काही नाविण्य आणण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करत असते. यामध्ये सामाजिक, राजकीय, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचे हुबेहुब चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येतात. या परिवात ज्युनिअर, सिनिअर अशी काही भानगडच नसते. प्रत्येक जण कुणाला काहींना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या परिवाराचं टीमवर्क उल्लेखनीय असल्यामुळे आज या परिवारात सगळेच कलाकार प्राथमिक स्वरुपाच्या रांगोळ्यांपासून थेट व्यावसायिक दर्जाच्या रांगोळ्या काढताना दिसतात. रांगोळ्यांच्या माध्यमातूनच अनेकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवाराची सुरुवात करताना समविचारी हौशी कलाकार एकत्र आले आणि आज तीस वर्षानंतर त्याचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आर्थिक पाठबळ नसतानाही आपल्या जिद्दीवर आणि केवळ आपली हौस म्हणून रांगोळी प्रदर्शन भरवणारं जोगेश्वरीतलं एकमेव रंगावली परिवार...

आज या रंगावली परिवारातल्या तीस ते चाळीस कलाकारांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. या परिवारातला कोणताही कलाकार हा बक्षिसासाठी किंवा मानधनासाठी रांगोळी काढत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत, एकमेकांना मदत करत, रांगोळी काढण्यातला पुरेपूर आनंद हे कलाकार घेतात. या परिवारात सगळेच आर्टिस्ट नाहीत. कुणी आयटी क्षेत्रातला तर कुणी वेगळ्याच क्षेत्रातले खास आपला वेळ काढून रात्रीचा दिवस करुन आपली रांगोळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा चुकत असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, त्याच्याकडून ते करवून घेणं हा या परिवाराचा जणू काही अट्टहासचं. आपली रांगोळी अयोग्य वाटली तर त्यावर झाडू मारला जाणार हा कमी अधिक प्रमाणात दिला जाणारा धाक असे परंतु या धाकामुळे अनेक कलाकार घडले. टीमवर्क हे मोठं वैशिष्ट्य या परिवाराचं म्हणावं लागेल.

रांगोळी काढण्यासाठी शाळेतली जागा उपलब्ध करणं, सर्व वर्ग स्वच्छ करणं, वर्गातील बाकं लावणं, फरशी पुसण्यापासूनची सर्व कामं रंगावली परिवारातले कलाकाराचं करतात. सामाजिक मूल्य जपण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करत आहे. हौशी कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ या परिवाराने  उपलब्ध करुन दिलंय. हौशी ते व्यावसायिक कलाकार असा रंगावली परिवाराचा प्रवास अखंडपणे चालू आहे.


या परिवाराची लौकप्रियता एवढी की, या परिवारातले काहीजण हे चारकोप, बोरिवली, वसई, दहिसर, डोबिंवलीहून येणारे आहेत. या परिवारामध्ये स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे. रांगोळी प्रदर्शनाबरोबर काही प्रात्याक्षिकही दाखवण्याचा प्रयत्न रंगावली परिवार करते. गेल्या वर्षी कुंभार मातीची भांडी कशी बनवतो याचं प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं तसंच संस्कार भारती रांगोळीचं प्रात्याक्षिकही विनामूल्य भरवण्यात आलं होतं. त्यामुळे रंगावली परिवारामध्ये येणारा प्रत्येकजण इथे काहींना काही नक्कीच आपल्यासोबत घेऊन जातो असा अनेक रसिकांचा अनुभव आहे.



रंगावली परिवारामध्ये वेगवेगळे प्रयोगही केले जातात जसे की रांगोळीऐवजी वेगवेगळ्या मीडियाचा वापर करुन रांगोळी साकारली जाते. लाकडाचा भुसा, मीठ, साबुदाणा, तांदूळ, डाळ, वाळू अशा निरनिराळ्या पद्धतीचा वापर करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. या परिवाराचं वेगळेपण म्हणजे एक ठराविक विषयाला अनुसरुन रांगोळ्या काढल्या जातात. या वर्षीचा विषय आहे एक्सप्रेशंन्स. मार्केटमध्ये जसा ट्रेंड असेल तो ट्रेंड रंगावली परिवारामध्ये पाहायला मिळतो. होणार सून मी या घरची मधली जान्हवी असेल, मिस्टर बिन, टाइमपासमधील प्राजक्ता, दगडू, नाना पाटेकर आणि आत्ताची लेटेस्ट जय मल्हार तसंच दाभोळकर सामाजिक विषयाला अनुसरुन असणाऱ्या लक्षवेधी रांगोळ्यांचा खजिना  रंगावली परिवारामध्ये पाहायला मिळतो. 

रांगोळीला कष्ट भरपूर आहेत, त्यातून मिळकत काहीच नाही पण यातून मिळणारं समाधान खूप आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही. एक रांगोळी काढणाराच ते समजू शकतो ! आपण कितीही चांगली रांगोळी काढली असली तरी, जाताना मलाच ती पुसायची आहे याची खंत जरी वाटत असली तरी त्यात गुंतायचे नाही निर्विकारपणे पुसून पुढे जायचे ही शिकवण या रांगोळी कलाकारांकडून शिकता येते.

या परिवारातल्या रांगोळ्या पाहताना रसिकांची नजर खिळते ती व्यक्ती चित्रांकडे. माधुरी दिक्षित, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाराज यांची चित्रं हुबेहूब वाटतात. जणू काही एखादे पोट्रेट काढूनच जमिनीवर अंथरले आहे. प्रत्येकजण ते बघताना प्रथम हे चित्र आहे की, खरोखरची रांगोळी याची खात्री करून घेणारच. अशा रांगोळ्यांचा आस्वाद घ्यायला विसरु नका. सौंदर्याचा आनंद काय असतो अनुभवयाचा असेल तर रंगावली परिवाराच्या रांगोळ्यांना जरुर भेट द्या. 


Tuesday 18 November 2014

वेड लावलंय प्रो कबड्डीनं ...

प्रो कबड्डीम्हणजेच प्रोफेशनल कबड्डी. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कबड्डीपटू प्रो कबड्डीमध्ये झळकताना दिसतायत. अनेक वर्षांचा इतिहास या खेळाला आहे. राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जात असला तरी क्रिकेट वेड्यांच्या दुनियेत आता तो अस्तित्वासाठी धडपडतोय. अन्य खेळांप्रमाणे या खेळालाही ग्लॅमर मिळावं म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्र येऊन प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित केली आणि खेळाडूंची जिद्द आणि रसिक प्रेक्षकांचा उत्साह पाहता कबड्डीची आयपीएल सुरू असल्याचाच भास झाला. 


आयपीएलची मॅच बघताना जो जल्लोष पाहायला मिळतो तसाच जल्लोष मुंबईतल्या NSCI च्या मैदानात पाहायला मिळाला. कबड्डीच्या क्लबमध्ये खेळणारे खेळाडू आणि इतर खेळांमध्ये (Sports) पारंगत असलेल्या खेळाडूंचाही प्रेक्षकांत समावेश होता. संपूर्ण स्टेडियम कबड्डीप्रेमींनी भरलेलं होतं. प्रत्येक टीमला विशिष्टं नावं देण्यात आली होती. यू मुंबाला सपोर्ट करणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा आवाज स्टेडियममध्ये घुमत होता. सगळ्यात भन्नाट गोष्टं म्हणजे प्रत्येक टीमचं स्वतःचं गाणं होतं. त्यातलं Vizag या टीमचं तेलुगु भाषेतलं गाणं सर्वांनी एन्जॉय केलं. मुंबईच्या टीमसाठी यू मुंबा हे गाणं होतं. पुण्याच्या टीमचं 'पुणेरी फलटण आली रे...' हे गाणंही भाव खाऊन गेलं. पण गाण्यांमुळे एक वेगळाच माहौल तयार झाला होता. कोणत्याही टीमने एखादा गुण पटकावला की त्या टीमचं गाण लावलं जायचं आणि रसिक त्या गाण्यावर ठेका धरायचे. दिमाखात मैदानाशी समरस होणाऱ्या खेळाडूंना पाहताना प्रेक्षकांचा उत्साह क्षणोक्षणी वाढत होता. रंगीबेरंगी लाईट्सचा इफेक्ट ग्लॅमरमध्ये भर घालत होता. 

एकमेकांना सहाय्य करून आपले सात गडी राखण्याचा प्रयत्न या खेळात केला जातो. आपला गडी बाहेर गेला तर त्याला परत आत आणण्यासाठी तेवढ्याच जिद्दीने प्रयत्न केले जात होते. बोनसचे एक-एक गुण मिळवून विरोधी संघाला मागे टाकण्यामध्ये 'यू मुंबा टीम'च्या शब्बीर बापू आघाडीवर होता. 'यू मुंबा' टीमचा कॅप्टन अनुप कुमार यानंही चांगली कामगिरी केली. लेफ्ट टर्न लावणारा 'यू मुंबा टीम'चा जीवा कुमार आणि सांताक्रुझ इथे राहणाऱ्या इशांत यांना दुखापत झाली, परंतु त्याचा परिणाम खेळावर मात्र कुठेच झाला नाही. 


रेडर आणि डिफेन्डर म्हणून आपली कामगिरी बजावणारे खेळाडू जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होते. आपलीच टीम जिंकावी यासाठी मॅच (Kabaddi Match) बघायला आलेला प्रत्येक जण प्लेयर्सना प्रोत्साहन देत होता. आपल्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी बजवावी यासाठी त्या-त्या टीमचे कोच योग्य वेळी टाइम आऊट घेऊन आपल्या संघाला मार्गदर्शन करत होते. सर्वांचंच लक्ष गुणांकडे लागलं होतं. एकेका गुणासाठी खेळाडू जिवाचं रान करत होते. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आशीर्वाद या सगळ्याची सांगड इथे सतत जाणवत होती. सामना अटीतटीचा होत होता त्यामुळे प्रक्षेकांचं आणि खेळाडूंचं टेन्शन वाढतच चाललं होतं. गेम कधी पलटेल याचा काहीच अंदाज नव्हता आणि शेवटी 'यू मुंबा'ने बाजी मारली. या टीमच्या सपोर्टर्सनी स्टेडियम डोक्यावर घेतलं. 


प्रो कबड्डीने प्रेक्षकांना तर समाधान दिलंच शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळूनही अद्याप प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या अनेक डिफेन्डर्स आणि रायडर्सना ग्लॅमरही मिळवून दिलं. 


Thursday 1 May 2014

गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.......

शाळा... आपली शाळा म्हण्यापेक्षा प्रत्येकाला माझी शाळा म्हण्यालाच फार आवडतं. आपुलकीमायाप्रेमशिस्त आणि ज्ञानाचा खजिना कुठे मिळत असेल तर तो शाळेतच. माझ्या शाळेला मी कधीच विसरु शकत नाही. मुंग्या जशा वारुळातून बाहेर पडतात तशाच या शाळेच्या आठवणी आहेत. शाळेची एक आठवण अनेक आठवणींना  उजाळा देत असते. शिक्षकांनीही आमच्या मनावर अशाच काही आठवणी कोरुन ठेवल्या आहेत. त्याच आठवणींची आज आठवण येतेय.

जोगेश्वरीच्या हायवेला लागून असणारी अस्मिता माझी शाळा. सगळ्यांच्याच परिचयाची आहे. शिशु वर्गापासून दहावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण या शाळेत घालवल्यामुळे शाळेबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. शाळेतल्या मित्र-मंडळींची येणारी आठवण सहाजिकच आहे पण या सोबतच आम्हांला आठवण येतेय ती आमच्या बाईंची.


पहिलीच्या वर्गातल्या मुंलांना काय हवयं नकोय या गोष्टींकडे लक्ष देणाऱ्या, लहान मुलांची आवड-निवड ओळखण्यामध्ये प्राथमिकच्या शिक्षकांची मोठीच कसरत असते. प्राथमिकला असताना पहिली ते चौथीपर्यंत आम्हांला एकच बाई शिकवायला होत्या. त्याचं नाव सौ. गद्रे बाई. सगळया विषयांची ओळख करुन देणाऱ्या, इतर कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करणाऱ्या, सोप्या पद्धतीने गणिताची ओळख करुन देणाऱ्या आणि नावडत्या विषयाची आवड निर्माण होईल असं भन्नाट काहीतरी सांगणाऱ्या आमच्या बाईंना आम्ही कधीच विसरु शकत नाही. त्यांच्या पर्सनालिटीबद्दल, त्यांच्या साड्यांबद्दल आम्ही नेहमीच चर्चा करायचो. बाईंनी केसात गजरा माळला असेल किंवा एकंदर बाईंनी काहीतरी वेगळं केलं असेल तर ते लगेचच आम्हांला समजायचं. कारण आवडणाऱ्या व्यक्तीला आपण खालपासून वरपर्यंत न्याहळत असतो. तशाच आमच्या बाई होत्या, सगळ्यांच्या आठवणींत राहतील अशा.

आमच्या मस्ती करण्यावर बाई नेहमी आम्हाला धमकवायच्या  करा, तुम्ही मस्ती... मी आता शिकवणार नाही  या एका वाक्यावर आम्ही लगेच शांत बसायचो.  आता तुम्हाला समजणार नाही, पण मोठ्या वर्गात गेल्यावर तुमची गय केली जाणार नाही. माध्यमिकला प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतील, सगळ्या विषयांचा अभ्यास नीट करा, मस्ती करु नका अशा सूचनांची जाणीव बाई पदोपदी करुन देत होत्या, पण त्या म्हण्यामागचं गांभीर्य आम्ही समजून घेतलं नाही.

चौथीचं वर्ष कसं संपलं ते समजलच नाही. निरोप समारंभ जवळ आला होता, प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जाणार यासाठी निरोप समारंभ असतो याची कल्पना होती परंतु पुढच्या पाचवीच्य़ा इयत्तेत बाई आपल्याला शिकवायला नसणार याची कल्पनाच नव्हती. अखेरीस निरोप समारंभाचा दिवस उजाडला. वर्गात आम्ही मस्त अंताक्क्षरी खेळत होतो, विनोद सांगत होतो, एकमेकांची खिल्ली उडवत होतो एकंदर खूप मजा करत होतो पण  यावेळी बाई आमच्यात फार काही मिसळल्या नाही. बाईकडे बघितल्यावर बाईंचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण आम्हांला काहीच उमगत नव्हतं. त्यादिवशी आम्ही जास्तच दंगा करत होतो तरी बाई आम्हांला ओरडल्या नाही.

काही दिवसानंतर आम्हांला समजलं... त्यादिवशी बाई का शांत होत्या, बाई का रडत होत्या. यापुढे बाई आम्हांला शिकवायला नसणार आणि आम्ही बाईंना त्रास द्यायला नसणार याचं बाईंना वाईट वाटत होतं. बाई आम्हांला शिकवायला नसणार याची जाणीव पाचवीत झाली. मोठ्या वर्गात गेल्यानंतर बाईंची अधिकच उणीव जाणवायला लागली. रोज मधल्या सुट्टीत बाईंना भेटायला जायचो, बाईंशी गप्पा मारायचो आणि रोज आमचा अट्टहास असायचा ‘’ निदान एक विषय तरी शिकवायला या ना बाई.’’  

 बाईं तुम्ही आम्हांला मारलंत तरी चालेल किंवा आम्ही बाई कधीच मस्ती करणार नाही, आम्ही मस्ती केली तर तुम्ही परत आमच्या वर्गात शिकवायला येऊ नका  इतपत आमची समजावणी चालली होती. पाचवीच्या वर्गात जाऊच नये असं वाटायचं. मधल्या सुट्टीत परत बाईंना भेटायला जायचो तेव्हा बाईंना म्हणायचो ‘’ बाई निदान पी.टी चा विषय तरी तुम्ही शिकवा नाहीतर संगणक तरी शिकवायला या  असा आमचा नेहमीचा अट्टहास असायचा. बाईंशी गप्पा मारताना मधली सुट्टी कधी संपायची हेच समजायचं नाही. असे किती दिवस असतील बाईंशी बोलण्यासाठी आम्ही प्राथमिक विभागात जाऊन गप्पा मारायचो आणि डब्बा खायचा विसरुनच जायचो. आमच्या बाईंशी गप्पा मारण्यातच आमचं पोट भरुन जायचं. आमच्या आग्रहापायी आणि आमची समजूत काढताना बाईंनी वास्तव स्थिती काय असते ते सांगितलं  दर चार वर्षांनंतर आमच्या हाताखालून अनेक विद्यार्थी माध्यमिकला जात असतात. तसे या वर्षी तुम्ही जात आहात, आम्हांलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. बाईंनाही रडायला आलं.


काही महिन्यानंतर आम्हांला समजायला लागलं आता बाई आपल्याला कधीच शिकवायला नाही येणार. मग बाई कुठेही भेटल्या की आम्ही लगेच जाऊन त्यांच्या पाया पडायचो, त्यांची विचारपूस करायचो त्याही आम्हांला अभ्यासाबद्दल विचारायच्या, आपूलकीने चौकशी करायच्या, आमच्या पालकांबद्दल विचारायच्या कारण पालक त्यांचे पाल्य आणि बाई असं वेगळं नातं निर्माण झालं होतं.

बाई आम्हांला आता शिकवायला नसणार हे आम्ही समजू शकत होतो पण बाई आम्हांला कायमच्या सोडून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. आमच्या बाईंना घशाचा कॅन्सर झाला होता. बाईंनी त्यांचा आवाज गमावला होता. आम्हांला बाईंबद्दल जेव्हा समजलं तेव्हा आमच्या कानांवर आमचा विश्वासच बसला नाही. बाईंच्या प्रेमापोटी आम्ही लगेच बाईंच्या घरी भेटायला गेलो. भेटायला गेल्यावर बाईंनी आम्हांला हाताच्या ईशाऱ्यानेच बसायला सांगितले. रोज विद्यार्थ्यांना शांत करणाऱ्य़ा बाई आज स्वत: च शांत झाल्या होत्या. बाईंना बरं वाटावं म्हणून आम्ही त्यांना रोज भेटायला जायचो त्यांची विचारपूस करायचो, त्यांच्या न बोलण्यातूनही आम्हांला सर्व काही कळत होतं. बाईंना आनंदी बघायला आम्हांला फार आवडायचं  पण हा आनंद क्षणभंगूर असेल असं वाटलं नाही बाईंचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो पण तो दिवस कधीच आला नाही.


 ....नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक  प्रथमिकच्या निरोप समारंभाच्या आठवणी संपण्या आधीच बाईंनी आम्हांला आठवणींचा निरोप दिला...... जरी आज आमच्या बाई आमच्याबरोबर नसल्या तरी बाईंनी दिलेली शिकवण आमच्यासोबत आयुष्यभर राहिल. यशाच्या प्रत्येक पायरीवर बाई तुमचा आशीर्वाद नेहमीच भासत राहिल.


बाई तुमची फार आठवण येतेय....









Saturday 12 April 2014

श्रध्दा  'अंधश्रध्दा '  बनते  तेव्हा .......

आपल्या आजूबाजूला अंगाला पिवळा रंग लावलेले, हातात आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे, रस्त्यावर धुडगूस घालणारे पोतराज, तसेच अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिबांच्या फाट्याने स्वत: ला मारुन घेताना दिसतात. केस मोकळे, कपाळभर कुंकू मध्येच कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून किंवा मुलाला पायावर ठेवून जाताना दिसतात. नारळ फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग असे निरनिराळे प्रकार पाहायला मिळतात.
     
पूर्वी देवळात फक्त समई आणि बाहेर एक विजेचा दिवा असायचा. आता देऊळच नव्हे तर आसपासचा संपूर्ण परिसर दिव्याच्या रोषणाईने झगमगताना दिसतो. आजकाल नवसाचे नारळ आणि पाळणे लावायला देखील देऊळं पुरत नाही.
     
गणपती उत्सव असो, देवीच्या नवरात्रीचा उत्सव असो, एखादे तीर्थक्षेत्र असो, कुठ्ल्याही साईबाबांचे, देवीचे, मारुतीचे देऊळ असो  किंवा चर्च, मशीद  असो तिथे भाविक असंख्य संख्येने उपस्थित असल्य़ाचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. हे सगळं बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की ही भक्ती, श्रद्धा की इरिशिरी ? या सगळ्याच धर्मामध्ये देवाचे प्रस्थ वाढलेलं दिसत आहे.
      
असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा अध्यात्माकडे वळतो तेव्हा तो उत्क्रांतीकडे जात असतो, अंताकडे जात असतो जिथे परमेश्वर असतो, जिथे त्याचा शेवट असतो. पण ख-या अर्थाने अध्यात्माकडे वळलेला माणूस विरक्तीकडे वळलेला असतो. त्याचा संसारातला रस हळूहळू कमी होत जातो. परमेश्वराच्या चिंतनात त्याचा वेळ जास्त जातो. इथे श्रद्धा दिसते भक्ती दिसते पण काही तरी मागण्यापुरती. इथे आलेला प्रत्येक माणूस काहीतरी मागण्यासाठी आलेला दिसतो. कोणाला मूल पाहिजे, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसायात यश तर कोणाला सत्ता अशा एक ना अनेक मागण्या घेऊन लोक तिथे येतात.
          
देवावर श्रद्धा असणे वाईट नाही. श्रद्धेमुळे आत्मिक बळ मिळतं असं म्हटलं जातं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य मनाला शांती मिळण्यासाठी जागा शोधत असतो आणि जास्तीतजास्त लोक त्यासाठी देवळात जाण्याचा मार्ग अवलंबतात. कही लोकांच्या मते देव ही एक संकल्पना आहे. एखाद्या शक्तीला परमेश्वर मानून त्याच्यावर श्रद्धा ठेवून कुणाचं भलं होणार असेल तर होऊ दे. सगळे प्रयत्न करुन परमेश्वर मला नक्की यश देईल अशी श्रद्धा ठेवणं वेगळं, पण काहीच न करता परमेश्वर करेलच अशी अंधश्रद्धा ठेवल्यावर जर आपले काम नाही झालं तर मात्र श्रद्धाळूंचा देवावरचा विश्वास तर उडतोच पण प्रत्येक गोष्टींवर असणारा त्याचा विश्वास डगमगायला लागतो, तो निराश होतो आणि सगळं जीवनच विस्कळीत होऊन जातं.
          
देव आहेच आणि तो काम करणारच असे समजून देवाला प्रत्येक गोष्टीसाठी नवस करणं, काहीच न करता देवावर नुसती श्रद्धा ठेऊन बसून राहणं हा अतिरेक झाला. लहान मुल आई घरात दिसली नाही की घाबरतं, पण आई दिसली की आई आपल्या पाठीशी आहे म्हणून ते बिनधास्त खेळत त्यातून सगळं शिकतं राहतं. आपली श्रद्धा तशीच असली पाहिजे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे म्हणून सगळी कर्तव्ये धैर्याने पार पाडली तर ती श्रद्धा कामाला येते.
          
पण माणूस फक्त देवावरच श्रद्धा ठेवतो असं नाही तर त्याच्या अनेकांवर श्रद्धा असतात. नेहमी पाहण्यात येणा-या लोकांपैकी काही आई वडीलांवर श्रद्धा ठेवणारे, साधूवर श्रद्धा ठेवणारे, वास्तूशास्त्रावर श्रद्धा ठेवणारे, मांत्रिकावर श्रद्धा ठेवणारे, अंगात देव-देवी येते त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे, भविष्यावर श्रद्धा ठेवणारे असतात. काही जण सतत घर बदलणं, विकणं, किंवा घरात सतत भिंती पाडणं, वस्तूंची हलवाहलव करणं यातच गुंतलेले असतात. पैशाचा आणि वेळेचा किती व्यय होतो याकडे त्याचं लक्षच नसतं. मग पैसै कमी पडला  की घर चांगलं नाही, मग ज्योतिषाकडे जाऊन ज्योतिषी सांगेल तसं करणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आसतात. हे चक्र अव्याहत चालू असतं. ज्योतिष शास्त्रावर नितांत श्रद्धा असणारे लोक देखील आहेत. जे सतत कुठल्या ना कुठल्या ग्रहाला शांत करण्यात मग्न असतात.
          
लोक गुरुमंत्र घेतात. गुरुवर श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. ते जो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जायचे सोडून त्यांची सेवा करण्यातच काही लोक मग्न असतात. सतत त्यांच्या अवतीभोवती असणं. घरात म्हातारे आईवडील असतील तर, त्यांना औषधपाणी करणार नाहीत, पण गुरुंना वस्त्र दान देणं, चांदी-सोन्याच्या वस्तु देणं. अशा लोकांचे परमेश्वर चिंतन कमी असते. मग मांत्रिक तांत्रिक गाठायचे, कुठून तरी ताविज आणायचे, नारळ घरात आणून बांधायचे असेच प्रकार हास्यास्पद प्रकार पाहयला मिळतात.
          
या सगळ्यात चांगले शिकलेले, सुशिक्षित, मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही समावेश असलेला दिसून येतो. हे असं वागताना किंवा त्यांचा या गोष्टीत असलेला समावेश पाहून प्रश्न पडतो की शिक्षण म्हणजे फक्त डिग्र्या का? ज्या शिक्षणातून खरे खोटे, चांगले वाईट काहीच समजत नाही अशा शिक्षणाचा काय उपयोग ? समजून घेऊन श्रद्धा ठेवणे गैर नाही पण श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ नये ह्याची सुशिक्षित लोकांनी तरी काळजी घ्यायला पाहिजे. श्रद्धेची अंधश्रद्धा होऊन विपरित काही घडू नये यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे.
       सत्य नाकारते ती  अंधश्रध्दा आणि सत्याला सामोरं जाण्याचं आत्मिक बळ देते ती श्रध्दा
   
                               
                                                           
                                 
   

                                    
       शब्दाविणे संवादू .....

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात पण शब्दांशिवाय बरच काही बोलून जातो यामध्ये केल्या जाणा-या देहबोलीचा, ह्स्तांदोलनामागील असणा-या भूमिकेचा आपण अजिबात विचार करत नाही यामागील कोणती धारणा असेल ? याचा आपण कटाक्षाने विचार करत नाही. परंतु ही देहबोली, हस्तांदोलन हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. परंतु ती व्यक्त करण्याची पद्धत वेगवेळ्या प्रातांत आणि देशात निरनिराळी असल्याचे दिसून येते.
     
जेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून लाभलेल्या देहाचा मोठ्या कल्पकतेने वापर करुन माणसाने इतर माणसांशी संवाद साधला आहे. इतकी देहबोली प्राचीन आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलं, तरी देहबोलीचा वापर करुन आपण तिथली भाषा अवगत नसली तरी तिथल्या रहिवाशांशी संवाद साधू शकतो; पण देहबोली ही निर्विवाद असी शास्त्रीय भाषा नाही भरपूर आणि वास्तवपूर्ण माहितीच्या आधारावर देहबोली जागली जाते. म्हणूनच स्थळ, काळ, प्रसंग यानुसार एकाच कृतीचा, एकाच चिन्हाचा अर्थ कधी सारखाच असतो तर कधी बदलतो. सर्व साधारणत: ज्या देशात राहतो, ज्या प्रातांत राहतो तिथल्या देहबोलीची आपल्याला नकळत चांगली जाणीव असते, माहिती असते परंतु परक्या मुलूखात गेलो, परदेशात गेलो आणि त्या ठिकाणच्या वापरातल्या देहबोलीची अपल्याला माहिती नसली,तर कधी-कधी विचित्र प्रसंग घडू शकतात.

हॅडशेक किंवा हस्तांदोलन हे देहबोलीतीलच नियामक खूणांमध्ये येते. दोन व्यक्तींमधला कित्येकदा हा पहिलाच शरीरस्पर्श असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जसा नमस्कार तसे पाश्चात्य लोकांमध्ये हॅडशेक!  दुस-यांचे स्वागत करण्यासाठी अभिवादनदर्शक हालचाल !जरी अनेक पाश्चात्य देशांत हॅडशेक सर्वसामान्य असला तरी पुष्कळ इतर देशांमध्ये समाजामध्ये स्वागताच्या अभिवादनाच्या वेगवेगळ्या हालचाली प्रचलित आहेत.

अरब लोक एकमेकांच्या दाढीचे चुंबन घेतात. बांटू लोक भेटल्यावर एकमेकांचे हात घट्ट पकडून सावकाश हवेत उंचावतात आणि मग सोडतात. एस्किमो लोक नाकावर नाक घासतात. कुळ्याही सामाजाच्या सांस्कृतिक चालीरीती अभ्यासताना या हालचालींना मोठे महत्त्वाचे स्थान असते.
     
हॅडशेक ही हालचाल मुख्यत: अस्तित्वात आली ती व्यक्ती निशस्त्र आहे हे दर्शविण्यासाठी. ज्या उजव्या हातात आपण शस्त्र धरतो तो हात रिकामी असल्याचे समोरच्या व्यक्तीला दिसावे शत्रूत्वाची भावना नाही. मित्रत्वाची आहे हे त्या व्यक्तीला कळावे  यासाठी हस्तांदोलन केले जाऊ लागले. सैन्यातील सॅल्यूट ही विशिष्ट हालचालही या हेतूनेच जन्मली.
     
रोमन काळात स्वागतासाठी किंवा मित्रता दर्शविण्यासाठी हस्तांदोलन करीत नसत त्यासाठी एकमेकांच्या दंडांना स्पर्श करण्याची प्रथा होती. हॅडशेक करणे, हे त्याकाळी मित्रता आणि आदरभाव दोन्ही व्यक्त करण्यासाठी हॅडशेक होऊ लागला.
    
फ्रांन्समध्ये पटकन केलेले हलके असे एकच हस्तांदोलन असते. घट्ट पकडीचे जोरात हात हलवून हस्तांदोलन करणे असभ्यपणाचे समजतात. फ्रेंच स्त्री तिचा हात प्रथम पुढे करते. तरुण लोक आणि अगदी जवळचे मित्र- मैत्रिणी दोन्ही गालांचे पुसट, उडते असे चुंबनही घेतात.
    
जर्मन लोक एकदा-दोनदा हात हलवत घट्ट पकडीचे हस्तांदोलन करतात. गालाचे चुंबन सहसा घेत नाहीत. एक हात खिशात ठेऊन दुस-या हाताने हस्तांदोलन करणे असभ्य मानतात. मुलांनी खिशात हात घालणे अनादराचे लक्षण समजतात.
    
ऑस्ट्रेलियामध्ये स्वागत करण्यासाठी मैत्रीपूर्ण पक्के (फर्म) असे हस्तांदोलन करतात. स्त्रियांशी त्यांनी आपणहून हात पुढे केल्याखेरीज हस्तांदोलन करीत नाहीत. स्त्रिया आपापसात भेटल्यावर मैत्रीदर्शक चुंबन घेतात. लांबच्या माणसाला ग्रीट करण्यासाठी हात हलवितात. ऑस्ट्रेलियन माणसं ही मैत्रीपूर्ण अनौपचारिकपणे वागणारी आणि पटकन प्रतिसाद देणारी असतात.
     
चीनी माणसं ही विशेषत: पाहुण्यांना पाश्चात्य लोकांसारखे हस्तांदोलन करण्याची प्रथा वेगाने फैलावत असली तरी मान किंचीत हलविणे किंवा वाकविणे ही स्वागताची पारंपारिक प्रथा आहे.
       
थायलंडमधील लोक आपल्याकडील नमस्ते प्रमाणेच हात जुळवून वै करतात याचा अर्थ हॅलो आभारी आहे. हात जितके वर जुळविले तेवढा अधिक आदर समजतात.
       
ब्रिटिशांचा सिंगापूरमध्ये फार प्रभाव असल्याने त्यांच्या ब-याच हालचालींचे  अनुकरण असल्याचे दिसते. भेटल्यावर हस्तांदोलन करण्याचा सामान्यत: रिवाज आहे.
     
युरोपियन लोकांपेक्षा इंग्लिश लोक थोड्या कमी प्रमाणात हस्तांदोलन करतात. अमेरिकामध्ये खूप मैत्री असेल आणि ब-याच काळाने भेट होत असेल तर स्त्रिया एकमेकींना मिठी मारतात.पुरुष स्त्रीच्या गालाचे चुंबन घेतात. पुरुष मात्र एकमेकांना मिठी मारत नाहीत. ते हस्तांदोलनाचा हात दुस-या हाताने समोरच्याचा दंड पकडतील. जपानी लोकांचे परंपरागत स्वागत म्हणजे कमरेत वाकणे. पण पाश्चिमात्यांच्या वाढत्या सहवासानमे हल्ली जपानी लोक कमी दाबाचे कमी वेळाचे हस्तांदोलनही करतात.

    तर मग आता ‘’प्रभाते करदर्शनम’’ करण्यास काहीच हरकत नाही.