Friday 28 November 2014


कौतुकाचा वर्षाव की सहानुभूती ?? 

कोकणात जायचं म्हणटलं तर साऱ्या प्रवाशांची पावलं आपसुकच वळतात ती कोकण रेल्वेकडे... कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित नसल्याचा निर्वाळा सुरक्षा आयुक्तांनी यापूर्वीच दिला होता पण असं असलं तरी खिशाला परवडणारं तिकीट आणि जलद गतीचा प्रवास यामुळेच कोकण रेल्वे सदानकदा ओव्हरलोडेड दिसते. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे ट्रॅकमॅन नेहमीच दक्ष असतात... सचिन पाडावे त्यापैकीच एक... आज सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनाने कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले... अशा या कोकणच्या सुपूत्राचं अनेकांनी कौतुकही केलं. बॅकस्टेजला काम करणाऱ्या कोकणपुत्राच्या शौर्याची बातमी सर्वच न्यूज पेपरमध्ये फ्रंट पेजला छापण्यात आली होती... पण या सचिनच्या पदरात कोकण रेल्वे प्रशासनाने मात्र फक्त ३०० रुपयांची मानधन भीक घातली. एवढचं नाही तर त्याला खडे बोलही सुनावले....

सचिन पाडावे... रेल्वेमार्गावर गस्त घालण्याचं काम करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ इथल्या एका पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरित रेल्वे कंट्रोल रुम आणि उक्षी स्टेशनला याबाबतची माहिती दिली. मात्र तोपर्यंत उक्षी स्टेशनवरून कोकणकन्या एक्स्प्रेस सुटल्याची माहिती त्यांना मिळाली.  ताशी ७५ किमी वेगानं येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातल्या टॉर्चच्या साहाय्यानं सचिन तुटलेल्या ट्रॅकपासून उक्षी स्टेशनच्या दिशेनं धावत सुटले आणि हातातल्या बॅनरनं उक्षी बोगद्याजवळ असलेल्या कोकणकन्या एक्सप्रसेच्या इंजिन चालकाला त्यांनी धोक्याची खूण केली. इंजिन चालकानंही प्रसंगावधान दाखवून त्वरित ब्रेक दाबला आणि कोकणकन्या एक्सप्रेस तुटलेल्या ट्रॅकच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर थांबवली आणि कोकणकन्येचा अपघात टळला. 
ताशी ७५ किमी वेगाने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस त्या तुटलेल्या ट्रॅकवरुन गेली असती तर ती थेट नदीत कोसळली असती आणि हजारो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असतेमात्र ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनामुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. आपली चोख जबाबदारी पार पाडणाऱ्या सचिनच्या शौर्यामुळेच कोकणकन्या एक्सप्रेसचा अपघात टळला...
कौतुकाचा वर्षाव सचिनवर तर होत होताच पण कोकण रेल्वे प्रशासनाचं तोंड काहीसं कडवं झालं होतं... रेल्वे प्रशासनाची परमिशन न घेता वार्ताहरांना आपली कामगिरी सांगितल्यामुळे सचिन यांना कोकण रेल्वे प्रशासनानं दटावणी केली... परंतु जीवाची बाजी लावून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवताना त्यांनी बजावलेली ड्यूटी या प्रशासनाला कदाचित समजलीच नसावी आणि म्हणूनच एवढा अपघात टाळणाऱ्या कोकणपुत्राला फक्त ३०० रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं असावं...

रेल्वे प्रशासनानं पाडावे यांना दिलेली वागणूक पाहता रेल्वे प्रशासनाची खरचं कीव वाटू लागली आणि भर उन्हांत ट्रॅकची तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्यूटी डोळ्यासमोर तरळू लागली...

No comments:

Post a Comment